Advertisement

शेतकरी संपावर गेला तर मराठी निबंध | Jar shetkari sampavar gela tar marathi Nibandh

शेतकरी संपावर गेला तर मराठी निबंध | Jar shetkari sampavar gela tar marathi Nibandh  

आपला देश कृषीप्रधान देश आहे व आपल्या देशात शेतकऱ्याला अन्नदाता मानले जाते. शेतकरी दिवस रात्र आपल्या शेतात राबून देशासाठी अन्न धान्य, भाजीपाला व फळे फुले तयार करतात. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकऱ्याचे योगदान 17% आहे. शेतकरी भारताचा पाठीचा कणा आहे. शेतकऱ्यांमुळेच आज आपण अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर आहोत. याशिवाय खूप सारे खाद्यान्न पदार्थ आपल्या देशातून इतर देशात निर्यात केले जातात. आपल्या देशातील 72% लोकसंख्या गावाकडे राहते व यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. 


भारतीय समाजात शेतकर्यांचे येवढे योगदान असूनही आज देशातील शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची आहे. रात्रंदिवस शेतात राबून ही त्यांच्या पिकाला योग्य भाव दिला जात नाही. याचा परिणाम अनेक शेतकरी आत्महत्या करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की जर शेतकरी कंटाळून संपावर गेला तर... आपल्या देशात शिक्षक, डॉक्टर, सरकारी कर्मचारी तसेच कामगार आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संपावर जातात. परंतु शेतकरी खूप कमी वेळा संपावर जातो. आणि जर शेतकरी दीर्घकाळ संपावर गेला तर संपूर्ण देशात अराजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. शेतात पीक येणार नाही. परिणामी देशात जेवढे अन्न शिल्लक आहे तेवढे हळू हळू संपायला लागेल.


एका एका भाकरीसाठी भांडणे होऊ लागतील. देशातील अन्न संपल्यावर शासनाला विदेशातून अन्न-धान्य आयात करावे लागेल. या अन्नाचे भाव खूप जास्त होतील. शेतकरी धान्य पिकावणार नाही तर देशाची अर्थव्यवस्था खालावेल. मोठ मोठ्या कारखान्यांना शेतातून कच्चामाल पाठवला जातो. परंतु शेती होत नसल्याने कच्चा माल उपलब्ध होणार नाही. परिणामी देशातील उद्योगधंदे ठप्प पडतील. हळू हळू आपला देश मागे पडत जाईल. खरे पाहता जर शेतकरी संपावर गेला तर सर्वकडे अव्यवस्था आणि अराजकता निर्माण होईल.


शेतकऱ्यांनी संपावर जाऊन नये म्हणून शासनाने वेळीच अंमलबजावणी करायला हवी. फक्त कर्जमाफी न करता आयात-निर्यात धोरणांमध्ये बदल करून शेतीमालाला योग्य भाव मिळवून द्यायला हवा. जलसिंचनाच्या सोयी, सशक्त पिक विमा इत्यादी सुविधा सहज व स्वस्त दरात उपलब्ध करायला हव्यात. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन आधुनिक शेती शिकवायला हवी. पूर व इतर नैसर्गिक संकटात नुकसान झालेल्या पिकाची भरपाई करायला हवी. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे म्हणून त्यांच्या जीवाचे देखील आपण जाणायला हवे.

--समाप्त--